महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे आज संपूर्ण जगाला छञपती शिवराय माहीत झाले...... छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटले तर सर्वच अंगाने त्याच्याकडे पहावे लागते. कारण आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याला तोडच नाही. धर्मव्यवस्था,राजव्यवस्था,समाजकारण, राजकारण,न्यायव्यवस्था,अर्थव्यवस्था,महसुल, शेती,भाषा,शिक्षण, राष्ट्र ह्या सर्व गोष्टींना स्पर्श करणारे जगातील ते एकमेव राजे ठरतात... शिवरायांना ' कुळवाडीभूषण रयतेचा राजा ' हे विशेषण महात्मा जोतिबा फुले यांनी दिले. महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे आज संपूर्ण जगाला छञपती शिवराय माहीत झाले. फुलेंच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग घडला तो म्हणजे ब्राम्हणांनी लग्नाच्या वरातीमधून त्यांना हाकलून दिले.हा घाव त्यांच्या जिव्हारी लागला.पण करणार काय? महात्मा जोतिबा फुले अस्वस्थ झाले,विचार करू लागले. धर्मव्यवस्थेमुळे आपला अपमान झाला.वर्णव्यवस्था,जातीव्यवस्था,अस्पृश्यता मानणारा हा धर्म आहे.ब्राम्हणांच्या दहशतीखाली समाज जगत आहे. या समाजाला कसे जाग्रृत करावे?कोणाची प्रेरणा द्यावी?एक ना अनेक प्रश्न निर्माण होत होते. महात्मा फुलेंना एक इंग्रजी अधिकारी लिजिट साहेब यांनी इंग्रजीमध्ये असलेला छञपती शिवरायांचा इतिहास थोडाफार सांगितला होता. त्यांना शिवरायांबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्यांची शिवरायांचा इतिहास जाणुन घेण्याची जिज्ञासा वाढली.त्यांनी माहिती गोळा केली. पाहतात तर काय साक्षात छञपती शिवरायांनासुध्दा धर्माच्या नावाखाली शुद्र ठरविले होते. राज्याभिषेक नाकारला होता.पण शिवरायांनी ब्राम्हणांची मक्तेदारी मोडीत काढून सर्व बहुजनांना एकञ करून जातीव्यवस्था, अस्पृश्यता संपविण्याचा प्रयत्न केला.हेच काम आपल्याला पुढे करायचे आहे.म्हणून महात्मा फुल्यांनी छञपती शिवरायांना आपली प्रेरणा मानली. पेशव्यांनी शिवरायांना इतिहास जमा केले होते.पण महात्मा फुलेंनी 1869 मध्ये रायगडावर जाऊन समाधी शोधून काढली.जगातील पहिले मराठी चरिञ -एक हजार ओव्यांचा पोवाडा लिहून लोकांपुढे आणले व 19 फेब्रुवारी 1869 साली पहिली शिवजयंती पुणे येथे सुरू केली.शिवरायांच्या प्रेरणेने महात्मा फुल्यांनी आता समाजकार्य सुरू केले.ते अस्पृश्यतेच्या रूढीवर प्रहार करू लागले. त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरू केल्या.प्रबोधनाच्या माध्यमातून समाजजागृती सुरू केली. शिवरायांच्या प्रेरणेने समाज जागृत व्हायला लागला.धर्मव्यवस्था मोडकळीस येऊ लागली.ही अवस्था बाळ गंगाधर टिळक यांना पाहवत नव्हती.त्यांना वाटू लागले की ब्राम्हणधर्म बुडतो की काय.म्हणून त्यांनी महात्मा फुले गेल्यानंतर सार्वजनिक शिवजयंतीवर ताबा मिळवला व गणोशोत्सव सुरू करून समाजाला पुन्हा धर्माकडे वळविले.महात्मा फुलेंच्या कुळवाडीभूषण रयतेचा राजा असलेल्या शिवरायांना त्यांनी गोब्राम्हण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापकामध्ये परावर्तीत केले.महात्मा फुलेंनी केलेली सामाजिक क्रांती टिळकांनी धर्मप्रतीक्रांतीत परावर्तीत केली आणि बहुजन राजा ब्राम्हणी बंदीगृहामध्ये बंदिस्त केला. टिळकांनी जाणीवपूर्वक इतिहास संशोधक वि.का. राजवाडे व इतिहास संशोधन मंडळाच्या इतर इतिहासकारांच्या मदतीने संपूर्ण शिवचरिञच बदलून टाकले. शिवरायांच्या इतिहासामध्ये दादु कोंडदेव-कुलकर्णी ह्या समकालीन व आदिलशहाच्या कोंढाणा किल्ल्याच्या सुभेदाराला शिवरायांच्या बालपणीचे शिक्षक, मार्गदर्शक व स्वराज्याचे पाया भरणारे म्हणून सांगितले.रामदास गोसावी यांना शिवरायांचे गुरू म्हणून संबोधले.शिवराय व रामदासांची भेट सुध्दा झाली नाही हे सत्य असतांना शिवरायांच्या व रामदासांच्या काल्पनिक कथा, आख्यायिका,दंतकथा,चमत्कार रचून त्याला सत्यता प्राप्त करून देण्याचा खोडसाळ प्रयत्न केला.अशाच प्रकारे राज्यभिषेकाला सर्व ब्राम्हणांनी विरोध केला असतांना गागाभट्टाला अक्षरशः दोन कोटी होनाची लाच देऊन काशीहून आणण्यात आले.त्या गागाभट्टाला असे चिञित करण्यात आले की,गागाभट्ट आले नसते तर शिवराय छञपती झालेच नसते.सामान्य व्यक्तींना असामान्य दाखवून बहुजन मावळ्यांच्या कर्तृत्वाला नाकारणार्या ब्राम्हणी इतिहासाचा पर्दाफाश केला पाहिजे.
Comments
Post a Comment